बाळकडू?

आज लै मोकळा वेळ मिळाला आजूबाजूला डोकवायला.
गल्लीत पोरांच्या खेळण्याचा आवाजच नाही, पोरं आहेत का नाही प्रश्न पडावा.
सांजच्याला थोडं बाहेर पडलो.

डेअरीत दूध विकत घ्यायला आलेलं एक कुटुंब.
लाल-निळ्या रंगाचा ढगळा शर्ट, खाकी रंगाची चड्डी, डोळ्यावर चष्मा असं ते नुकतंच शाळेत जायला लागलेलं पोरगं. बाजूच्या वाड्यात एकानं चेंडू मारला तो ह्या समोर येऊन पडला. पोरगं तुरुतुरु धावत गेलं, त्यानं चेंडू घेतला नि भिंतीपल्याड फेकला.

तिथं त्याची आई, "Oh, Look what he is upto!"
बापानं जाडजूड भरलेलं त्याचं वॉलेट तिच्यासमोर बडवलं आणि पोराकडे आला. धपकन् धपाटा दिला, का ते त्याचं त्याला किंवा त्या चिमुरड्याला माहित. हात धरून तरातरा ओढत त्याला आईकडे आणण्यात आलं.
मग नकळत आईच्या बॅगेतून बाहेर आलेली सॅनिटायझरची बाटली पाहून सगळा खेळ कळला.
फोनवर बोलत कार चालवत बाप त्यांना गाडीत भरून निघून गेला.

फक्त आपण आणि आपल्या आधीच्या पिढीलाच का हो मैदानी खेळाचं व्यसन होतं?
हल्ली मैदानं नाहीत म्हणून खेळ नाहीत असं अवसान गाळलं जातं, पण मला ते काही पटत नाही. फक्त अनोळखी पोरानं मारलेला चेंडू हाताळला म्हणून एवढं रामायण असेल तर पुढचं आयुष्य पोरानं हातमोजे घालून जगावं कि काय?

घरात AC आहे म्हणून खिडक्या बंद, बाहेर दूधवाला-गोळीवाला, चिंच-बोरवाला चोर म्हणून दारं बंद. कबूतरापलीकडे काही पक्षी असतात ते त्यानं कधी पाहावं?

शाळेत रुमलाच्या जागी टिशू-पेपर नेऊन पोरानं रुमालाचे खेळ कधी शिकायचे मग?
त्याचं जग जर चार भिंतीतल्या एका कंप्युटरमध्ये वसवून दिलं तर उद्या उड्या मारत भिंती ओलांडायला कसं शिकेल ते?

हुशार तर नक्कीच असावं त्याने, माझ्यासारखा माठ होऊन काहीच हाशील नाही हे मान्य. पण त्याला ताणण्याला हद्द असावी. मला स्वतःला सत्तरीच्या बोंब असताना, ९६ का पडले, ४ कुठे गेले म्हणून मार खाल्लेले किस्से ऐकलेय मी. का?
जमवेल उद्या ५० सर्टिफिकेट, ४० ट्रॉफ्या...
पण, खोचलेला शर्ट बाहेर येऊपर्यंत आनंदात बुडून, हरपून खेळायला मिळेल का त्याला शब्दशः उभ्या आयुष्यात?

लहानपणीच डिओची सवय लावली गेली तर ते पोरगं खोडरबर विकत घेताना त्याचा वास घेईल का कधी?
लीडवाली पेन्सिल का तर म्हणे टोक काढायला वेळ जायला नको. अरे टोक काढताना त्या लाकडी पेन्सिलच्या चकत्या काढण्याची मजा स्वतः जगून त्याला कसं वंचित ठेवू शकता?

पावसात भिजू नये म्हणून कार किंवा रिक्षाने ने-आण करणार, मग तो कसा कधी अवकाळी पावसात टिकेल? हवा बदलली कि चड्डया आणि डॉक्टर बदलायची वेळ येते मग.
मित्रांच्या गळ्यात हात टाकून घरी चालत येण्यागत दुसरं सुख नाही.

सर्दी होते म्हणून हे नको खाऊ, खोकला होतो म्हणून ये नको खाऊ, an apple a day keeps doctor away का काय म्हणत पोरगं फक्त तीच फळं खातं.
करवंद काय? माहित नाही!
आवळे काय? माहित नाही!
ऊस खाल्ला का कधी? असं काही करतात का!
बोरं खातो? नको, खोकला होतो!
तिखट खातो? नाही!
बर्गर खातो? हा, मॅकडोनाल्डसमध्ये!

खाण्याच्या बाबतीत असं शेण खाल्लं तर ते कोल्हापुरातली एखादी पंगत कसं जेवेल?
कसंय ना घाणीचं, धुळीचं ग्रहण दाखवत त्याला मातीपासून वेगळं करायचं, आणि मग तग धरेल अशी अपेक्षा ठेवायची.


कशापायी?

कालच एका मित्रासोबत चर्चा झाली. जनाब केहते हैं, "यार यहाँ हम विकेंड के लिये तरसते हैं| Saturday-Sunday मस्त सोनेका और तू वहाँ बावले जैसे घुमने जाता है.."
"पहिले पाढे पंचावन्न"चा शोध का आणि कसा सहजा-सहजी लागला असावा ह्याची परिणीती आली. हा प्रश्न प्रत्येक ट्रेकरला आयुष्यात किमान एकदा विचारला जातोच. प्रत्येकाचं वेगळं उत्तर असू शकतं.
संदीप आणि सलिलच्या गाण्यात काही apt ओळी आहेत ज्या हा आटापिटा सहज उलगडून व्यक्त करतात.

'मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी,
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी'

लहानपणी चालू झालेला, "चांगला इंजिनिअर" गावचा प्रवास, "चांगला ट्रेकर" व्हायचंय ह्या गावी कधी निघाला हे नेमकं शब्दात आणि काळात मांडणं अशक्य आहे.
मला आठवतं लहानपणी रेल्वे प्रवासात खिडकी हा माझ्यासाठी अनिवार्य घटक होता. डोकावून काय-काय पाहायचो, नजरेत काय-काय साठायचं ते नेमकं आठवत नाही. कितीही आटापिटा केला तरी खिडकीतल्या दुसऱ्या दांडीच्या वरून पाहिलंच नाही, उंचीच नव्हती तेवढी.
आज मात्र नजर फक्त आणि फक्त तिसऱ्या-चौथ्या दांडीच्या वरच असते, ओळखीचे आणि अनोळखी डोंगर शोधत. मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक प्रवासात तर खिडकीतून एक नजर टाकून डोंगर पाहून सांगू शकतो कि कोणतं स्टेशन येणार आहे. ही तऱ्हा बर्याच ट्रेकर्सची असेल आणि.

और जनाब पूछेन्गे, "भाई, क्या उखाड लोगे इससे?"
साहजिकच, त्याची मारायला पंधरा गोष्टी असल्या तरीही मी खपली काढणारच नाही, कारण ते त्याला पचायचं नाही.

अगदी कॉलेजला जात होतो त्या दिवसांत मला शिस्त हा प्रकार नव्हताच, आजही तो आहे का नाही हा वेगळाच मुद्दा. सकाळी उठायची बोंब होती, ८.४० च्या ऐवजी ९.५०! जसा ट्रेकला जायला लागलोय सकाळची ५.२७ असो किंवा रात्री १.४७, गाडी नाय चुकणार! शनिवार-रविवार ट्रेक करून जर अगदीच पिपाणी वाजली तर सोमवारी डायरेक्ट सुट्टी! आधी प्रवास करून आलो तरी उरलेल्या प्लास्टिक रॅपर्सचा पत्ताच लागत नव्हता. आता ट्रेक असो किंवा साधा प्रवास, सगळं माझ्यासोबत घरी येतं.

इससे पेहले कि जनाब कुछ कहे, माहीत आहे, सगळे नॉन-ट्रेकर्स कचरा नाही करत. पण, महत्त्वाचा मुद्दा असा कि शक्यतो दुनिया आपल्या बापाची जागिर असल्यागत कचरा टाकणारा नग नॉन-ट्रेकर असण्याची शक्यता जास्त असते.

Not all best people around are Travelers and Mountaineers, but most of the times Mountaineers and Travelers are the best bunch of people around.

आधी रात्री ट्रेनने बोरघाटातून जाताना उल्हास व्हॅलीच्या पल्याड त्या सुनिल शेट्टीच्या बंगल्याच्या लाईट्स भारी वाटायच्या. आता त्याच डोळ्यात सलतात. डोंगरावर जाणारा नागमोडी रस्ता तेव्हा खूप भारी वाटायचा, आता तो नजरेत सलतो. लहानपणी भूगोलात "वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप होते" असा मांडलेला वनलायनर म्हणजे किती गहन प्रश्न आहे ते जाणवतं. Deforestation आणि त्याच्या परिणामाची ग्रॅव्हिटी जर घरी बसून कळली किंवा जाणवली असं मत असेल तर त्यावर हसू येतं. तसंही 'कळणे' आणि 'जाणवणे' ह्यातली उडी प्रत्येकाला झेपेलच असं नाही.

स्वतःचं सामान वागवणं म्हणजे हमाली नव्हे हे पटलं तर ट्रेकिंग खूप भारी प्रकार आहे.

जनाब सोचते हैं कि वहाँ जंगलमें खाने-पीने कि तो लग जाती होगी.
आता त्या बाहेर बिस्लेरी पिणाऱ्याला कसं सांगावं कि अहुप्याच्या टाक्याचं पाणी म्हणजे काय जादू आहे.
तू आंब्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहा, आम्ही आंबा, करवंद, जांभूळ आणि इतर रानमेव्यासाठी डोंगराची वाट धरतो.

गेल्या मे महिन्यात किस्सा झाला, मित्र म्हणाला, "कल्याणच्या बाजारात जांभळं आणि करवंद छान मिळालीत."
आता त्याला सांगितलं खरी करवंदं काय असतात तर त्याला ते पचणार नाही.
पटकन् म्हण आठवली, "सरड्याची झेप कुंपणापर्यंत!"

लोणावळ्याच्या अमुक-तमुक पॉईंटवर शंभराच्या गर्दीत पाहिलेला सनसेट जर त्याला आवडला तर मी त्याला का उगा कोकणदिवा, अंगठेसरच्या सनसेटच्या गमती सांगू?
राजमाची पॉईंटला लागलेलं धुकं आणि जरा उघडीप झाल्यावर दरीत दिसलेले ढग त्याला भारी वाटले असतील तर का मी त्याला रायरेश्वरचं धुकं आणि पावसाआधी कुलंगहून दरीत दिसणाऱ्या ढगांचं गाजर दाखवू.

भूगोलात खूप वेळा वाचलेलं असतं ना ह्या नदीचं खोरं, त्या नदीचं खोरं.. खोऱ्यानं पैसे कामवायचं वय झालं तरी बहुतांश लोकांना माहित नसतं नदीचं खोरं म्हणजे काय प्रकार असतो.
 
अब जनाब जरूर पूछेन्गे, "जानकर भी क्या उखाड लिया भाई?"
"पालथ्या घड्यावर पाणी!", बाबा, तू खोरं म्हणजे Gillette च्या ऍडच पाहा, कांदाट, कोयना, भातसा, वेळवंडी आमच्यापर्यंतच राहू दे.

लहानपणी जर नावडतं स्टेशन असेल तर उल्हास नगर. सगळाच उल्हास आहे तिथं. उल्हास नदीचा नाला झालेलं पाहून घाण वाटायचं, आता लोकांची कीव येते.
उल्हास नदीला शिव्या घालणारे लोक, त्यांना काय कळणार कि उल्हास व्हॅली खरंतर काय प्रकार आहे आणि तिचं आपण काय करतोय!

दारू ढोसून आलेल्या हँगओवरपेक्ष्या ट्रेकमुळे असलेली सोमवारीची अंगदुखी बरी.
ट्रेकमुळे वेगळीच तयारी होते, पावसात भिजून सर्दी होणं वगैरे प्रकार दुर्मिळ होतात.

जनाबने एक बात खूब कही, "ट्रेक ना करने से नुकसान तो नही होता नजर आ रहा.."
तेच म्हणतोय मी, कशापायी?